व्हीएस न्यूज - कसोटी आणि त्यापाठोपाठ एकदिवसीय मालिका झाली. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्यांची रंगत क्रिकेटविश्वाला पाहता येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी होणार आहे. त्यामुळे या मालिकेचा विजयी श्रीगणेशा कोणता संघ करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताने कसोटीपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकली. कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व विराट कोहलीकडे होते. त्यानंतर लग्नासाठी कोहलीने सुट्टी घेतली आणि रोहित शर्माकडे संघाची कमान सोपवण्यात आली. रोहितने एकदिवसीय मालिका जिंकवून देत, संघाचे नेतृत्व कोणाकडेही असले तरी हा संघ जिंकू शकतो, हे एकदिवसीय मालिकेत दाखवून दिले. आता ट्वेन्टी-२० मालिका तो संघाला जिंकवून देऊ शकतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला होता; पण दुसऱ्या सामन्यात रोहितच्या द्विशतकाच्या रूपात संघाला संजीवनी मिळाली. दुसरा आणि तिसरा सामना जिंकत भारताने मालिका सहजपणे खिशात टाकली. ट्वेन्टी-२० संघात युवा खेळाडूंचा अधिक भरणा आहे, त्यामुळे या युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला रोहित कसा न्याय देतो, हे पाहणे महत्त्वाचे असेल. रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आहे. श्रेयस अय्यरनेही एकदिवसीय मालिकेत चांगली फलंदाजी केली होती. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनी अडचणीतून संघाला बाहेर काढण्यात सराईत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये हार्दिक पंडय़ाला सूर गवसलेला नाही आणि संघासाठी ही चिंतेची आहे. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे दोन्ही युवा फिरकीपटू सातत्याने भेदक गोलंदाजी करत आहेत. युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेरच्या षटकांमध्ये प्रतिस्पध्र्याच्या धावा रोखण्याचे काम चोख बजावत आहे; पण या सामन्यात त्याला कोण साथ देणार,याची उत्सुकता साऱ्यांना असेल. कारण मोहम्मद सिराज, बासिल थम्पी आणि जयदेव उनाडकट यांच्यापैकी एकाला बुमराहबरोबर गोलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदर या युवा अष्टपैलू खेळाडूला या मालिकेत तरी संधी मिळते का हे पाहावे लागेल.
श्रीलंकेच्या कामगिरीत सातत्याचा अभाव पाहायला मिळाला आहे. कसोटी मालिकेच्या अखेरीस त्यांना सूर गवसला होता. त्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी विजय मिळवला खरा, पण त्यानंतर पुन्हा एकदा ते पराभवाच्या दुष्टचक्रात अडकले. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी श्रीलंकेचा संघ आसुसलेला असेल. उपल थरंगा हा सातत्याने चांगल्या धावा करत आहे, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळताना दिसत नाही. अँजेलो मॅथ्यूजसारख्या अनुभवी खेळाडूला कामगिरीत सातत्य दाखवता आलेले नाही. कर्णधार थिसारा परेराला अपेक्षापूर्ती करता आलेली नाही; पण संघाने एकजूट केल्यास त्यांच्यामध्ये भारताला पराभूत करण्याची धमक आहे. ट्वेन्टी-२० संघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक क्रिकेटपटूने किमान २० ते ३० आयपीएल सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पदार्पणाचे दडपण नाही. चांगली कामगिरी उंचावण्यासाठी आयपीएलमधील अनुभव मोलाचा ठरेल. युवा क्रिकेटपटूंना त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आहे. त्यामुळे ते सवरेत्कृष्ट कामगिरी करताना संधीचे सोने करतील. भारताच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा असल्याचे म्हटले जात असले, तरी त्यांची कामगिरी नक्कीच उजवी ठरेल.
– दिनेश कार्तिक, भारताचा क्रिकेटपटू
वनडे मालिकेत आम्हाला पराभव पाहावा लागला. मात्र पहिल्या लढतीतील विजयामधून बोध घेणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक मालिका वेगवेगळी असते. एकदिवसीय प्रकारातून ट्वेन्टी-२० प्रकाराशी जुळवून घेण्याचे आव्हान आहे. मात्र ट्वेन्टी-२० मालिकेत आम्ही नव्याने सुरुवात करू. त्यामुळे या मालिकेत भारताला आम्ही चांगली लढत देण्यासाठी उत्सुक आहोत.
– थिसारा परेरा, श्रीलंकेचा कर्णधार
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी, जयदेव उनाडकट.
श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल परेरा, दनुष्का गुणतिलका, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रमा, दासून शनाका, चतुरंगा डीसिल्व्हा, सचिथ पथिराना, धनंजय डीसिल्व्हा, नुवान प्रदीप, विश्वा फर्नाडो, दुष्मंथा चमीरा.
वेळ : सायंकाळी ७.०० वा.पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002