व्हीएस न्यूज - भांडुप पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेत राजकीय भूकंप अनुभवायला मिळाला. भांडुपमधील विजयानंतर भाजपचे पालिकेतील संख्याबळ वाढले होते. फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. माजी उपमहापौर आणि भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन झाल्यामुळे पालिकेतील भाजपचे संख्याबळ ८१ झाले आहे. आता प्रभाग क्रमांक ११६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील निवडून आल्यामुळे पालिकेतील भाजपचे संख्याबळ ८२ वर कायम राहिले आहे. मात्र, काल भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी अचानकपणे महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्याची भाषा सुरू केली. संख्याबळ वाढल्याने महापालिकेत भाजपची सत्ता व महापौर येईल, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर धास्तावलेल्या शिवसेनेने वेगाने पावले उचवत भाजपच्या या खेळीला शह दिला. शिवसेनेने शुक्रवारी थेट मनसेच्या सहा नगरसेवकांना गळाला लावले. थोड्याच वेळात कोकण विभागीय आयुक्तांसमोर या नगरसेवकांची गटनोंदणी होणार आहे. त्यामुळे भाजपने ऐनवेळी दगाफटका केला तरी शिवसेनेने आपली बाजू भक्कम केली आहे.
सुरूवातीला ठाकरे बंधूंमध्ये समझोता झाल्यामुळे मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मनसेच्या या सहा नगरसेवकांनी राज ठाकरे यांना कळवताच परस्पर शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. त्यामुळे मुंबईत अवघे सात नगरसेवक निवडून आलेल्या मनसेला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला येत्या काळात याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा मनसेकडून देण्यात आलाय.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002