व्हिएस न्यूज – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्यातील अवर्षणग्रस्त भागात दुष्काळ जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबावरून स्वपक्षाला घरचा आहेर दिला. आतातरी सरकार राज्यातील दुष्काळी भागांची यादी जाहीर करणार आहे का? सरकारने डिसेंबर उलटून जानेवारी महिना आला तरी दुष्काळी गावांबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. चार-सहा महिने सर्वेक्षण होऊन उलटतात तरी दुष्काळ जाहीर केला जात नाही. लोकांनी या काळात मरायचे का? त्यादृष्टीने कोणतीही व्यवस्थादेखील सरकार करत नाही. केंद्र सरकारचे दुष्काळी क्षेत्र जाहीर करण्यासंबंधी निकष पाळायचे ठरवले तर राज्यातील एकही गाव पात्र ठरणार नाही, अशा शब्दांत खडसेंनी सरकारला सुनावले.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या या प्रश्नाला उत्तर दिले. दुष्काळी क्षेत्र ठरवण्यासाठी केंद्र सरकारने आखून दिलेले नवे निकष हे कठोर आणि वेगळे आहेत, ही बाब आम्हाला मान्य आहे. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकही गाव निकषांमध्ये बसणार नाही, ही बाब तितकीशी खरी नाही. गोंदियातील तीन गावांना याच निकषांनुसार आतापर्यंत दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पण एकनाथ खडसे यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्याच सरकारचे वाभाडे काढताना दिसले.