व्हिएस न्यूज - शुक्रवारी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले असून बोंडअळी, ओखी वादळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत तसेच काही मंत्र्यांच्या गैरकारभाराच्या मुद्दावरुन दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.
विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात घातलेल्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकले नाही. एकूण १९ विधेयके या अधिवेशनामध्ये विधानसभेत संमत करण्यात आली, यापैकी ११ विधेयके दोन्ही सभागृहात मिळून संमत करण्यात आली. तसेच एकूण ९२४५ तारांकित प्रश्न प्राप्त झाले.
हिवाळी अधिवेशनात प्राप्त झालेल्या २७६८ लक्षवेधी सूचनांमधून १२९ लक्षवेधी सूचना स्वीकृत झाल्या. त्यामधील ३७ लक्षवेधींवर सभागृहात चर्चा करण्यात आली. अधिवेशन काळात दहा १० दिवसात प्रत्यक्षात ६९ तास ५७ मिनिटे कामकाज झाले. यापैकी विरोधकांच्या गोंधळाने ४ तास २६ मिनिटे कामकाज होऊ शकले नाही. रोज सरासरी ७ तास ४६ मिनिटे कामकाज झाले, असे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.
बोंडअळी, ओखी वादळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत व काही मंत्र्यांच्या गैरकारभाराचा मुद्दा विधानसभा व विधानपरिषदेत उपस्थित करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. तसेच विरोधकांनी मराठा, मुस्लीम आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावर ही सरकारला धारेवर धरले. विरोधकांनी दोन्ही सभागृहात कोकणातील रिफायनरीवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेच्या नेत्यांमुळेच हा प्रकल्प कोकणात आल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी नव्या वादाला तोंड फोडले. तसेच याच अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वारंवार सरकारला धारेवर धरून विरोधकांची भूमिका बजावली तर आशिष देशमुख यांनी भाजपला घरचा आहेर देऊन बंडाचे संकेत दिले.