सरकारने १० फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करावी
पनवेल
2017-12-26
व्हिएस न्युज - पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार कंबर कसली असून मराठा समाजाला सरकारने दिलेली आश्वासने १० फेब्रुवारी २०१८ पर्यंत प्रत्यक्ष कृतीत न आणल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनालाच घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच १९ फेब्रुवारीपासून मराठा आंदोलन पुकारणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
पनवेलमध्ये नुकतीच राज्यस्तरीय सकल मराठा समाज समन्वयकांची बैठक पार पडली. २९ जिल्ह्यातील समन्वयक या बैठकीत हजर होते. हा निर्णय त्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. भाजप सरकारने मुंबईत सकल मराठा समाजाचा मोर्चा झाल्यानंतर घोषणांचा पाऊस पाडला. पण अद्याप त्या घोषणा कृतीत उतरवल्या नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपला इशारा देणारे पोस्टर्स मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले होते.