व्हीएस न्यूज - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००४ साली आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधानपदासाठी माझ्या नावाची घोषणा केली. त्यावेळी प्रणब मुखर्जी हे नाराज होणे स्वाभाविक होते. कारण, पंतप्रधानपदासाठीचे दावेदार असलेल्या प्रणब मुखर्जी यांच्या नावाऐवजी माझ्या नावाची घोषणा झाली होती, अशी प्रांजळ कबुली माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिली आहे.
नवी दिल्लीत प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्राच्या तिसऱ्या खंडाचा आज प्रकाशन सोहळा पार पडला, यावेळी मनमोहन सिंग यांनी आपले सहकारी मुखर्जी यांच्यासोबतच्या नात्याचा उलगडा केला. आघाडी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातील त्यांची मैत्रीही त्यांनी उलगडून दाखवली.
मनमोहन सिंग म्हणाले, सन २००४ मध्ये सोनिया गांधींनी माझी पंतप्रधानपदी निवड केली. मात्र, माझ्यापेक्षा त्यावेळी या पदासाठी प्रणबदा अधिक योग्य व्यक्ती होते. त्यावेळी माझ्याकडे इतर कुठलाही पर्याय नसल्याचे त्यावेळी प्रणबदांनाही माहिती होते. सिंग यांच्या या वक्तव्यावर कार्यक्रमातील उपस्थितांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खळखळून हसून त्यांच्या खुलेपणाने बोलण्याला दाद दिली.
सरकार चालवताना आमच्यामध्ये अनेक अपेक्षाच होत्या मात्र, कोणतेही मतभेद नव्हते. त्यामुळेच आमच्या नात्यात खूपच सहजता होती. आम्ही संलग्न टीम बनून सरकार चालवले, यामध्ये प्रणब मुखर्जी हे सर्वात महत्वाचे सदस्य होते. राजकारणात माझा प्रवेश हा अपघातानेच झाला. मात्र, प्रणब मुखर्जी हे खरे राजकीय व्यक्तिमत्व आहे. सध्या आपल्या देशातील ते सर्वोत्कृष्ट राजकीय व्यक्ती आहेत, असे सिंग यावेळी म्हणाले.
पी. व्ही. नरसिंहराव यांनी मला अर्थमंत्री होण्यासाठी निमंत्रित केले. त्यानंतर माझ्या क्षमतांनुसार मी प्रणब मुखर्जी यांच्यासोबत खूपच जवळून काम केले. ते तेव्हा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. वाणिज्य मंत्री, परराष्ट्रमंत्रीही होते. अजूनही त्यांचे या पदांशी घट्ट नाते असल्याचे ते म्हणाले.
मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात लिहीले आहे की, आघाडीचे सरकार चालवताना मी कधीही वैयक्तिक गोष्ट आडवी आणली नाही. आघाडीचे सरकार चालवणे अवघड काम होते मात्र, ते सुरळीत पार पडले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002