व्हिएस न्यूज - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या संख्येने रस्ते, समुद्र किनारे यावर होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त चोख ठेवला असून पोलिसांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. इतकेच नव्हे तर ३० हजार अतिरिक्त पोलिस रस्त्यांवर तैनात केले गेले आहेत. या दिवशी इसिस दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता मरीन ड्राईव्ह, वरळी सीफेस, बँड स्ट्रँड या सारख्या अति गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग झोन तयार केले गेले असल्याचे समजते. या परिसरात फटाके वाजविण्यावरही बंदी घातली गेली आहे.
या दिवशी दरवर्षी चौपाट्या तसेच रस्त्यांमध्ये अतोनात गर्दी होते. लोक नव वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात. लोकांनी स्वतःची वाहने रस्त्यावर आणून गर्दी करू नये म्हणून बेस्ट व रेल्वेने मध्यरात्री पासून विशेष सेवा देणार असल्याची घोषणा केली आहे. बेस्ट जादा बसेस सोडणार आहे तर पश्चिम मध्य रेल्वे मध्यरात्रीपासून विशेष लोकल्स चालविणार आहे.