व्हीएस न्यूज - बदलत्या माध्यमांच्या स्वरूपामुळे शासकीय जनसंपर्कात समाजमाध्यमांचा प्रभावी व सकारात्मक वापर ही काळाची गरज आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या धुळे जिल्हा माहिती कार्यालयाचे डिजिटल साप्ताहिक ‘यशार्थ’चा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
धुळे येथे नियोजन सभागृहात धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा माहिती कार्यालयाच्या‘यशार्थ’ या डिजिटल साप्ताहिकाच्या ‘दुष्काळासंगे लढाया... तुफान आलंया’ ! या वॉटर कप स्पर्धेवरील विशेषांकाचे प्रकाशन मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, दक्षता व गुणवत्ता विभागाचे अभियंता एस. एस. पाटील, अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री श्री.पाटील म्हणाले, अभिनव व नावीण्यपूर्ण जनहिताच्या उपक्रमांचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाची आहे. ‘यशार्थ’ या डिजिटल साप्ताहिकाच्या माध्यमातून अत्यंत कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांत निर्माण केलेल्या नेटवर्कची किमया, त्यातील सातत्य व वाचकांची वाढती संख्या निश्चितच प्रशंसनीय आहे. त्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी, कर्मचारी यांचे व ‘टीम यशार्थ’चे अभिनंदन करायला हवे. लोकाभिमुख शासनाची प्रतिमा निर्माण करणारे असे अभिनव प्रयोग प्रत्येक जिल्ह्यातून सुरू व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतरत्न आदरणीय अटलबिहारीजी वाजपेयी यांचा जन्मदिन तथा सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘यशार्थ’ च्या अंकाचे प्रकाशन केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांचे कौतुक करून मंत्री श्री.पाटील यांनी ‘यशार्थ’ च्या सर्व अंकांचे अवलोकन केले. तसेच निर्मितीची प्रक्रिया, विषयाची निवड, डिझायनिंग, व्हायरल करण्याचे तंत्र, त्यास मिळत असलेल्या प्रतिसाद यांची माहिती करून घेतली.
‘यशार्थ’ विकास प्रशासनाचा आरसा - पर्यटनमंत्री जयकुमार रावल
‘यशार्थ’ची संकल्पना राज्यात सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर धुळे जिल्ह्यात राबविण्यात आली. त्याला अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद, उपयुक्तता व त्याची गरज बघून त्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. ‘यशार्थ’ विकास प्रशासनाचा आरसा असून जिल्ह्यातीलच नाही, तर राज्यातील महत्वाच्या घडामोडी व त्याचे जिल्ह्यावर होणारे सकारात्मक परिणामांचे प्रतिबिंब त्यात नियमितपणे उमटताना दिसते. डिझायनिंग, विषय निवडीचे टायमिंग यामुळे डिजिटल युगातल्या रिडर्सला त्याने भुरळ घातली आहे.‘यशार्थ’ ला मिळणारा प्रतिसाद हा जिल्हा प्रशासन व जिल्ह्याची नवी ओळख आणि प्रतिमा निर्माण करणारा आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आम्ही एक परिणामकारक, व्यापक तसेच थेट जनतेत भिडणारा उपक्रम राबवू शकलो याचे समाधान आपणांस असल्याचे मनोगत यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केले. ‘यशार्थ’च्या उपक्रमाची संकल्पना, उद्देश व चालू अंकाच्या विषयाची पार्श्वभूमी तसेच वाचकांचा प्रतिसाद याबतची माहिती यावेळी प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाळ साळुंखे यांनी केले, तर सादरीकरण मनोहर पाटील व संदीप गावित यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002