व्हीएस न्यूज - दरवर्षी १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी येतात. आजपर्यंत तिथे कधी संघर्ष झाला नाही. साहजिकच तिथे २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उपस्थिती जास्त असेल याची प्रशासनालाही कल्पना होती. योग्य ती काळजी अशावेळी तिथे घेण्याची गरज होती. या घटनेला आता कोणताच रंग देऊन प्रकरण वाढवू नये. घडलेला प्रकार चांगला नाही. सर्वांनी शांतता बाळगावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शरद पवार यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना समाजातील सर्व स्तरातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, मी वढू गावातील लोकांशी या घटनेविषयी संवाद साधला असून येथे पुणे शहरातून आलेल्या हिंदूत्ववादी संघटनांनी येऊन चिथावणी दिल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. बाहेरून आलेले लोक येथे गोंधळ करून गेले. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण स्थानिक लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेशी ज्या लोकांचा काहीएक संबंध नाही. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून गावात गर्दी होती. यावेळी लोकांना येथे येण्याचे आवाहन २०० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे करण्यात आले होते. त्यामुळे गर्दी जास्त होणार याची सर्वांनाच कल्पना होती. येथील वातावरणात दोन दिवसांपासून अस्वस्थता होती. त्यामुळे योग्य ती दक्षता घेण्याची गरज होती. ही परिस्थिती ती न घेतल्यानेच उद्धवल्याचे पवार म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील एक दलितेतर तरूण कालच्या घटनेत मृत्यूमुखी पडला. ही गोष्ट चिघळू नये याची पोलिसांनी योग्य काळजी घेतली, हे चांगले झाले. या घटनेच्या तळापर्यंत पोलिसांनी जावे. याची चौकशी राज्य सरकारनेही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002