राहुल गांधीनी कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्यावी
नवी दिल्ली
2018-01-03
व्हीएस न्यूज – संघ आणि भाजप दलितविरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केले होते. गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी त्यावर प्रत्युत्तर देत कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी परिस्थितीची पूर्ण माहिती घ्यावी, असे म्हटले आहे.
कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी लोकांना घटनास्थळाची संपूर्ण परिस्थिती माहीत असावी. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेले आहेत, असे गृहराज्य मंत्री हंसराज अहिर म्हणाले.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांनी भाजप आणि संघाला जबाबदार ठरवले. तसेच दलितविरोधी संघ आणि भाजप असल्याचे गांधी यांनी मंगळवारी म्हटले. संघ आणि भाजपची दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर समाजात राहिले पाहिजेत, ही विचारसरणी आहे. उना येथे दलितांना झालेली मारहाण, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आता भीमा कोरेगावची घटना या तीन घटना त्याची उदाहरणे आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केली होती.