व्हीएस न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी या पार्श्वभूमीवर एका निवेदनाद्वारे संघटनेची भूमिका मांडली. काही घटक समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्तींना बळी पडू नका, शांतता राखा, असे आवाहन त्यांनी केले.
भीमा कोरेगावाचा हिंसाचार आणि त्यानंतर मुंबई, पुण्यासह त्याचे राज्यभरात उमटलेले पडसाद ही खूप दु:खद बाब आहे. जो काही प्रकार भीमा कोरेगावमध्ये घडला तो निंदाजनक असून याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीव्र निषेध करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यात जे दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. समाजात काही घटक जाणीवपूर्वक द्वेष आणि वैरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्तींच्या सुप्त हेतूंना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. विरोधी पक्षांकडून संघ आणि भाजपला भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून लक्ष्य केले जात आहे. कोरेगाव येथील ‘विजय दिवस’ देशविरोधी ठरवत त्याबद्दल उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी आक्षेप घेतला होता. संघ आणि भाजपनेच या हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून या पार्श्वभूमीवर केला जात आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002