व्हीएस न्यूज - बुधवारी दलित संघटनांनी भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’नंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज सरकारला लक्ष्य केले. राज्यातील परिस्थितीवर या बंद दरम्यान सरकारची भूमिका काय? असा थेट सवाल केला. त्याचबरोबर अग्रलेखातून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचाही समाचार घेतला. सोबतच राज्याचे वातावरण गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांनी बिघडवल्याचे देखील म्हटले आहे.
या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीचा वापर करू नये. दंगल भडकवण्यापेक्षा पेटलेल्या जमावास शांत करणारा व दिशा देणारा हाच खरा नेता असतो,अशा शब्दांत शिवसेनेने प्रकाश आंबेडकरांचा समाचार घेतला. तसेच बाजूच्या राज्यांतील लोक आमच्या राज्यात येऊन वातावरण बिघडवत आहेत, असे म्हणत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांना देखील सामनातून लक्ष्य करण्यात आले.
त्याचबरोबर सरकारवर निशाणा साधताना राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब महाराष्ट्राचा आहे. या सर्व परिस्थितीत आज सरकारची भूमिका नक्की काय आहे? पोलीस खात्याचे राजकारण व गृहखात्याचा भाजप झाल्याचे परिणाम राज्याला भोगावे लागत आहेत. सरकारने आता तरी निवडणुकांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवावे, जमिनीवर यावे. शिवसेनेशी लढायला सारे जीवन आहे. शिवसेनेस राजकारणातून खतम करण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा. राज्य पेटले आहे. ती शेकोटी एक दिवस तुम्हालाही खाक करील!, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला सुनावले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002