व्हिएस न्युज - रिझर्व्ह बँकेने २०० रूपयांच्या नोटांचा पुरवठा वाढवला आहे. यासाठी त्यांनी बँकांना एटीएममध्ये बदल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आरबीआयच्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी बँकिंग जगताला १ हजार कोटी रूपयांहून अधिक रूपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. सध्या बँका बुडीत कर्जामुळे अडचणीत आहेत. त्याचवेळी त्यांच्यावर या खर्चाचा आणखी भार पडणार आहे.
एका बँकरने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. तो म्हणाला की, आरबीआयने बँका आणि एटीएम उत्पादकांना लवकरात लवकर २०० रूपयांसाठी एटीएममध्ये बदल करण्यास सांगितले आहे. आम्हाला २ हजार रूपयांच्या नोटेबरोबर २०० रूपयांच्या नोटेचेही आवश्यकता आहे. आरबीआयचे हे चांगले पाऊल आहे. ही प्रणाली लागू करण्यासाठी ५ ते ६ महिने लागू शकतात, असे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १ हजार रूपयांच्या जुन्या नोटा चलनबाह्य ठरवण्यात आल्या होत्या. भ्रष्टाचार, काळा पैसा व टेरर फंडिंग रोखण्यासाठी उच्च मूल्याच्या नोटा मागे घेतल्याचे सरकारने त्यावेळी सांगितले होते. पण नंतर २ हजार रूपयांची नोट जारी करण्यात आली. यावरून सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर २०० रूपयांची नोट येणार असल्याचे वृत्त आले होते. २ हजाराच्या नोटांमुळे गतवर्षी एटीएममधून मोठ्याप्रमाणात पैसे काढण्यात आल्याचे बँकर्सनी म्हटले आहे. आरबीआय एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ठरवू शकते, असेही या बँकर्सने म्हटले. सप्टेंबर २०१७ मध्ये एटीएममधून एकूण २.४४ लाख कोटी रूपये काढण्यात आले होते. तर सप्टेंबर २०१६ मध्ये ही रक्कम २.२२ कोटी रूपये होती.