व्हीएस न्यूज - कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र हिंसक पडसाद उमटले होते. त्यानंतर कोरेगाव भीमामध्ये सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र रहात आहोत आणि यापुढेही राहणार आहोत,अशी भावना व्यक्त केली. एकीची भावना बोलून दाखवित त्यांनी सामाजिक ऐक्याला बाधा आणणाऱ्या प्रवृत्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दंगल गावाबाहेरील कार्यकर्त्यांनी व संघटनांनी गावात केल्याचा आरोपही यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गावातील महिला व मुलींना मारहाण झालेल्यांवर कारवाई करावी, दंगलीतील मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकाला १ कोटींची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी केली. हा हिंसाचार पोलिसांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नसल्यामुळे झाल्याचा गंभीर आरोप कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सरकारने येथील कार्यक्रमाची कल्पना असूनही हलगर्जीपणा दाखविल्याची टीकाही त्यांनी केली.
जो वाद वढू येथील समाधीवरून झाला त्याचे पडसाद उमटू नये म्हणून कोरेगाव भीमा गाव त्यादिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोरेगाव भीमाचे नाव नाहक बदनाम झाले आहे. घटनेनंतर ५ दिवस उलटूनही एकही मंत्री गावात फिरकलेला नाही, यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणीतरी येऊन २ समाजात तेढ निर्माण करत आहे, ज्यांनी हे घडवून आणले त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतील गेली ३ दिवस वीज-पाणी नाही. मात्र गावाबाबत खोटे व्हिडिओ व्हायरल केले जात आहे. हे प्रकार थांबवा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002