व्हीएस न्यूज - निश्चलनीकरणाच्या निर्णयाची वर्षपूर्ती असलेला ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेसकडून ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येईल. यानिमित्त काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनही करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या नोटाबंदीमुळे केवळ सामान्यांवरच काटकसर करण्याची वेळ आली असे नव्हे तर अर्थव्यवस्थेलाही मोठा झटका बसला,असा आरोप काँग्रेसने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला संध्याकाळी अचानकपणे नोटाबंदीची घोषणा करत ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे देशभरात तब्बल महिनाभर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्यांचे खूप हाल झाले होते. या पार्श्वभूमीवर सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने ८ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळायचे ठरवले आहे. त्यानुसार काँग्रेस नेते आणि प्रवक्ते देशभरात फिरून नोटाबंदीच्या दुष्परिणामांचा प्रचार करतील. तसेच नोटबंदी कशाप्रकारे अपयशी ठरली, हे दाखवून देण्यासाठी पक्षाच्या रिसर्च टीमकडून व्यापक प्रमाणावर माहिती गोळा करण्यात आल्याचे समजते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदी म्हणजे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे पाऊल, असे निर्णयाचे वर्णन केले होते. तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदी म्हणजे ‘महाकाय गैरव्यवस्थापन आणि संघटित व कायदेशीर लूट’ असल्याची टीका केली होती. त्यामुळे आता काँग्रेस येत्या ८ नोव्हेंबरला या मुद्द्यावरून सरकारविरोधात कशाप्रकारे वातावरण तापवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीचे ठामपणे समर्थन केले. नोटाबंदीचा निर्णय धाडसी असून यासाठी जगभरात भारताचे कौतुक होत आहे. काँग्रेस हा संधीसाधू पक्ष असल्याने वस्तू आणि सेवा करासारख्या (जीएसटी) आर्थिक सुधारणांचा त्यांनी विरोध केला असा चिमटाही त्यांनी काढला. नोटाबंदीद्वारे काळ्या पैशाला चाप लावण्याचा प्रयत्न होता. पण काँग्रेसच्या रडारवर काळा पैसा कधीच नव्हता. जीएसटीचा प्रस्ताव सर्वप्रथम काँग्रेसनेच मांडला होता. काँग्रेस शासित राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी जीएसटीला पाठिंबा दर्शवला. मात्र काँग्रेस हा संधीसाधू पक्ष असल्याने आता ते जीएसटीचा विरोध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002