जातीपातीची भांडणे लावणाऱ्यांना शिवसेना सोडणार नाही – उद्धव ठाकरे
मुंबई
2018-01-08
व्हीएस न्यूज - ज्यांचा कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडवण्यात पुढाकार होता, जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पुढे यावे. शिवसेना जातीपातीमध्ये भांडणे लावून राजकीय पोळी भाजणाऱ्यांना कदापी सोडणार नाही, असा इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. रविवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राज्यात जे अदृश्य हात दंगली घडवत आहेत, त्यांच्यावर सरकार कारवाई करत नसेल तर ते काम शिवसेना करील. काहींचे धर्मांतर झाले असले तरी रक्तातील धर्म संपलेला नसल्यामुळे राजकीय स्वार्थ साधू पाहणाऱ्या नेत्यांच्या इशाऱ्यावर समाजाने हिंसाचार घडवणे योग्य नाही. राज्यातील हवा गुजरात निवडणुकीनंतर बदलली असून राज्यातील थंडी कमी होऊन गर्मी देखील वाढली आहे. दिल्ली काबीज केली, आता तुम्हाला मुंबई काबीज करायची आहे. पण मुंबई तुम्हाला काबीज करू देणार नाही, ही शिवसेनेची शपथ आहे, असा थेट इशाराच उद्धव यांनी भाजपला नाव न घेता दिला.