व्हीएस न्यूज – राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा आणि शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे नेते, आमदार कपिल पाटील यांनी केली. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ८० हजार शाळा बंद करण्यात येणार असल्याचे औरंगाबाद येथे स्पष्ट केले होते. यावर बोलताना कपिल पाटील यांनी ही मागणी केली.
याआधी या सरकारने हजारो शिक्षकांना अतिरिक्त केले, कला-क्रीडा शिक्षण संपवले, रात्रशाळांवर घाव घातला, विनाअनुदानित शिक्षकांना फसवले आणि आता ८० हजार शाळा बंद करण्याचा डाव आखण्यात आला आहे, असे सांगतानाच शाळा बंद करायला सरकारचे डोके फिरले आहे काय? कष्टाने उभारलेल्या शाळा बंद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पतंजलीच्या शाळा उभारण्यात येणार आहेत काय? असा सवालही त्यांनी केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापासून शिक्षण विभाग वाचवण्याची गरज असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
८० हजार शाळा बंद होणार नाहीत – तावडे
मुंबई – येत्या १५ वर्षात राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही उद्दिष्ट नसून या सर्व अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिले. विनोद तावडे यांनी हे स्पष्टीकरण ट्विटरवरून दिले आहे. येत्या १५ वर्षात राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ही संख्या ३० हजारांवर आणण्याचे शिक्षण विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे, असे मत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवाने व्यक्त केले नसल्याचा दावाही तावडे यांनी केला आहे. शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही, असे सांगत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही तावडे यांनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002