व्हीएस न्यूज - भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये दंगल घडू नये ही घटनात्मक जबाबदारी पार पडण्यात गृहमंत्रिपदाची धुरा असलेले मुख्यमंत्री अपयशी ठरले. मात्र, दोन समाजात तेढ वाढविण्याच्या राजकीय जबाबदारीमध्ये मुख्यमंत्र्यांना यश आले, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद असलेल्या ‘डॉयलॉग अँड डायलेक्टिक-अ सेक्युलर परस्पेक्टिव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी आलेल्या चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दंगलीत पहिला दगड कोणी मारला, त्यामागील सूत्रधार कोण याबाबत सरकार काहीही बोलायला तयार नाही. सीसीटीव्ही फूटेज पाहिले किंवा दंगलीच्या व्हीडीओमध्ये सर्व प्रकार सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे. मात्र, याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे हा पूर्वनियोजित कट असावा ही शंका उत्पन्न होते. या प्रकरणामध्ये संभाजी भिडेगुरुजी, मिलिंद एकबोटे तसेच जिग्नेश मेवाणी, उमर खालीद आणि कबीर कला मंच यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, मूळ प्रकरणापासून लक्ष वळविण्यासाठी अनेकांची नावे गोवण्यात येऊन गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. परस्परविरोधी फिर्याद दाखल करून कागदी घोडे नाचविण्याखेरीज काही निष्पन्न होणार नाही.
खरे बोलल्याबद्दल बापट यांचे अभिनंदन
‘पुढील वर्षी सरकार बदललेले असेल’, अशी भविष्यवाणी करीत अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचे खरे बोलल्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे, अशी टिप्पणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. डाळींब उत्पादकांच्या मेळाव्यात ‘तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या आत्ताच सांगा. पुढील वर्षी सरकार बदललेले असेल’, असे विधान बापट यांनी नुकतेच केले होते. बापट यांनी सत्य बोलण्याचे धाडस दाखविले त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो,असे चव्हाण म्हणाले.
देशाची घटना वाचविण्यासाठी आघाडी करावीच लागेल…
भाजप-शिवसेना युतीप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये मोठा भाऊ कोण, असे विचारले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केल्याने काँग्रेसला फटका बसतो हे खरे असले तरी देशाची घटना वाचविण्यासाठी आघाडी करावी लागेल, असे सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एकाच विचारधारेचे आहेत. साखर कारखाने, दूध संघ या सहकार चळवळीतील आर्थिक आणि राजकीय सत्तेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला. माझ्या जिल्ह्य़ात तर मला राष्ट्रवादीचा त्रासच होतो, पण तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप या विषारी शक्तींचा सामना करायचा असेल तर वैचारिक मतभेद दूर ठेवून, हेवेदावे बाजूला ठेवून एक पाऊल मागे येत पुढे गेले पाहिजे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002