व्हीएस न्यूज – देशातील एक लाखाहून अधिक ग्रामपंचायती भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र हे बेस्ट परफॉर्मिंग स्टेट ठरले आहे. राज्यात १२ हजाराहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडण्यात आल्या आहेत.
भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ग्रामपंचायतीना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील १२ हजार ३७८ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे, तर १४ हजार ८७८ ग्रामपंचायतींमध्ये भारत नेटच्या कामास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश (पश्चिम) मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, आणि झारखंड ही राज्येसुद्धा भारत नेटच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत.
देशात ३१ डिसेंबर २०१७ अखेर २ लाख ५४ हजार ८९५ किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे निर्माण केले गेले याद्वारे हायस्पीड ब्रॉडबँड सेवेने देशातील १ लाख १ हजार ३७० ग्राम पंचायतीना भारत नेट च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेने जोडण्यात आले आहे.