व्हीएस न्यूज - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातील भाजप आता राहिलेला नाही. त्यावेळी या नेत्यांची सहज भेट होत होती. सध्याच्या पंतप्रधानांना १३ महिन्यांपूर्वी भेटीची वेळ मागून अद्यापही त्यांनी वेळ दिलेली नाही. त्यामुळे आता आपण जनतेसमोर जाऊन आपली भूमिका मांडणार आहोत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सिन्हा गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर नाराज आहेत. त्याचवेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आर्थिक धोरणांबरोबरच भाजपच्या कृषी धोरणांवरही कडाडून टीका केली आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वारंवार डावलले जात असल्याची खंतही त्यांनी वारंवार बोलून दाखविली आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा मोदी आणि शहा यांना लक्ष्य केले आहे.
एका कार्यक्रमात शहा मोदींना लाडू भरवतानाचे छायाचित्र प्रसिध्द झाले आहे. या छायाचित्रात त्यांच्या आजुबाजूला सुषमा स्वराज , राजनाथ सिंह, अनंत कुमार आदी नेतेमंडळी दिसत आहेत. त्याचा संदर्भ घेत सिन्हा यांनी आता अडवाणी हे मोदी आणि शहा यांच्यादृष्टीने ‘सामान्य’कार्यकर्ते झाल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींना वारंवार भेट मागूनही आपल्याला ते भेट देऊ शकले नाहीत. वाजपेयी, अडवाणी यांच्या काळात असे कधी घडले नव्हते. मोदी आपली भेट टाळत असल्याने आपण जनतेत जाऊन आता आपली भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट करतानाच सिन्हा यांनी आता मोदी आणि शहा यांच्या विरोधात आघाडी उघणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002