व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडून खासदारकीचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकणारे विदर्भातील नेते नाना पटोले यांचा अखेर गुरुवारी काँग्रेस प्रवेश झाला. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर फोटोसह ही माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमधील छायाचित्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पटोले यांचे स्वागत करताना दिसत आहेत.
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसप्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. दुसरीकडे, काँग्रेसच्या इशा-यावरच पटोले यांनी राजीनामा दिल्याचा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले होते. पटोले काँग्रेसमध्ये जातील, असे संकेत मिळत होते तरीही त्याबाबत ठोस काही समजून येत नव्हते. देवेंद्र फडणवीस जर भंडारा-गोंदियामधून लोकसभेसाठी लढणार असतील तर आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू, असे पटोले यांनी जाहीर केले होते.
पटोलेंच्या काँग्रेस प्रवेशाला मुहूर्त केव्हा मिळतो याबाबत राजकीय वतुर्ळात उत्सुकता होती. अखेर गुरुवारी काँग्रेसने नाना पटोले आपल्या पक्षात आल्याचे जाहीर केले आहे. हा पक्षप्रवेश नक्की केव्हा झाला, याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही. काँग्रेसने केलेल्या ट्वीटमध्ये दिलेल्या छायाचित्रात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, संजय निरुपम आदींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पटोले यांचे स्वागत करताना दिसत आहेत.
काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी आघाडी सरकारच्या उदासीन धोरणाविरुद्ध आवाज उठवून, डिसेंबर २००८ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, २००९ ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढले आणि पराभूत झाले. जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. २०१४ मध्ये त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा लोकसभा मतदारसंघात पराभव केला होता. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या धोरणांवर नाराजी दाखवत पंतप्रधान मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने टीका करत होते. शिवाय, शेतक-यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करीत होते. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात शेतक-यांसाठी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते. भाजपामधील सर्वच नेते पंतप्रधान मोदींचे गोडवे गात असताना पटोले यांनी मात्र त्यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याने भाजपामध्ये भूकंप झाला होता.
मे महिन्यात दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत पटोले यांनी शेतकरी व ओबीसींचे प्रश्न उपस्थित केले. मात्र,मोदींनी त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना बसायला लावले. तेव्हापासून पटोले हे मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. पटोले यांची एक लढाऊ नेते अशी ओळख आहे. राजकीय परिणामाची चिंता न करता, आजवर त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर स्वपक्षावर टीका करताना मागेपुढे पाहिले नाही.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002