देवाच्या भरवशावर सुरु आहे राज्याचा कारभार – आशिष देशमुख
अकोला
2018-01-17
व्हीएस न्यूज - पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजप आमदार आशिष देशमुख यांनी तोंडसुख घेतले आहे. देवेंद्रच्या नव्हे, तर देवाच्या भरवशावर राज्याचा कारभार सुरु असल्याचा टोला लगावत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. आमदार देशमुख अकोल्यात विदर्भ आत्मबळ यात्रेच्या निमित्ताने आले होते. त्यांनी यावेळी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आमदार देशमुख विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच विदर्भाबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी विदर्भातील ६२ मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून ते स्वतंत्र विदर्भाबद्दल जनमत अजमावत आहेत.
आमदार देशमुख यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांना आत्मबळ देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी तसेच बेरोजगार युवकांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी ७ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान विदर्भ आत्मबळ यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.