व्हीएस न्यूज - राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी निगडीत चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना ५ वर्षांचा कारावास व ५ लाख रूपये दंड ठोठावला आहे. चारा घोटाळ्यातील हे तिसरे प्रकरण आहे. याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आले असून त्यांनाही ५ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चाईबासा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ५६ आरोपींपैकी ५० जणांना दोषी तर सहा जणांना निर्दोष ठरवण्यात आले. ९५० कोटींच्या चारा घोटाळ्याशी निगडीत चाईबासा कोषागारमधून ३५ कोटी ६२ लाख रूपये काढण्यात आले होते. चाईबासा कोषागारप्रकरणी १२ डिसेंबर २००१ मध्ये ७६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
दोषी ठरवण्यात आल्यानंतर आरजेडीचे ज्येष्ठ नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी चारा घोटाळ्यातील सर्व निर्णयांविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्यातील देवघर कोषागारशी निगडीत एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे ते सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरूंगात कैदेत आहेत. चाईबासाची सुनावणी १० जानेवारीला पूर्ण झाली होती. माजी उपमुख्यमंत्री व लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनीही हा भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कट असल्याचा आरोप करत याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले. चाईबासा कोषागारप्रकरणी १२ डिसेंबर २००१ मध्ये ७६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान १४ आरोपींचा मृत्यू झाला. याप्रकरण लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रांसह सहा नेत्यांचा समावेश आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002