व्हीएस न्यूज - गरीबांना जास्तीत जास्त गरीब करायचे आणि श्रीमंतांना जास्तीत जास्त श्रीमंत करायचे ही भाजपची नीती आहे. असल्या पक्षांना बाजूला करायचे काम आपल्याला करायचे आहे अशी टीका करत आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर ताशेरे झाडले. मंठा या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरु आहे.
मंठा या ठिकाणी पोहचली त्याचवेळी झालेल्या सभेत अजित पवारांनी ही टीका केली. जालना जिल्ह्यात स्वर्गीय अंकुशराव टोपे यांनी सहकारी संस्था उत्तमरित्या चालविण्याचा आदर्श घालून दिला. राजेश टोपे हे त्यांच्याप्रमाणेच संस्थेचे काम पाहत आहेत. मात्र जालन्यातील इतर नेत्यांनी संस्था विकून खाल्ल्या असाही आरोप यावेळी अजित पवार यांनी केला.
राज्यात आज ९ हजार गावे ५० पैशांपेक्षा कमी आणेवारीतील आहेत. त्यातील ५ हजार गावे ही मराठवाड्यातील आहेत तरीही सरकारने मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले आहे असाही आरोप त्यांनी केला. मराठवाड्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल यात्रा काढण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारला या यात्रेमार्फत लक्ष्य केले जाते आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनीही सरकारवर टीका केली. खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. पण त्याचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. हे पैसे लवकरात लवकर मिळाले नाहीत तर आम्ही हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढू असा इशाराच यावेळी टोपे यांनी दिला.
तर धनंजय मुंडे यांनीही यावेळी सरकारविरोधात भाष्य केले. मंठा येथील राष्ट्रवादीच्या सभेला झालेली गर्दी अभूतपूर्व आहे. जिकडे जागा मिळेल तिकडे लोक बसले आहेत इतकी गर्दी आहे. घराच्या छपरावर बसूनही लोक राष्ट्रवादीच्या नेत्यांना ऐकत आहेत. ‘हवा का रुख बदल गया’ हेच या सभेचे सार्थ वर्णन करता येईल असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002