युवा क्रिकेटपटूंना आयपीएलचा पैसा महत्त्वाचा – उच्च न्यायालय
मुंबई
2018-01-30
व्हीएस न्यूज - इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलवर मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले असून सध्या तरुण क्रिकेटपटू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळून कोट्यवधी रुपये कमावण्यात धन्यता मानत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आयपीएल हे निव्वळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नसून यातून परदेशी चलनाचा मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने हे ताशेरे आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी ईडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान ओढले. नुकताच यंदाच्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला. या आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडू पदार्पण करणार आहेत. तर काही दिग्गज खेळाडूंना या लिलावात खरेदीदारच मिळाला नाही.