व्हीएस न्यूज – येत्या एक-दोन वर्षात आपले मुख्यालय मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरुन बेंगळूरला हलवण्याची तयारी जागतिक स्तरावरील सर्वात गर्भश्रीमंतांपैकी एक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरु केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची येत्या काही वर्षात उभारणी पूर्ण झाल्यानंतर यावर अंमलबजावणी अपेक्षित आहे. बीसीसीआयची स्वतःच्या मालकीची बेंगळूरमध्ये ४० एकर जागा असून येथेच एनसीए व अन्य सेवासुविधांची उभारणी केली जाणार आहे.
मुंबईतील क्रिकेट सेंटरची जागा सध्या भाडे तत्वावरील असल्याने तसेच पंचतारांकित लॉजिंग सुविधेवरील बेसुमार खर्च टाळण्यासाठी बीसीसीआयने याकडे मोर्चा वळवला आहे. मंडळाच्या ज्या-ज्यावेळी बैठका आयोजित केल्या जातात, त्या-त्या प्रत्येक वेळी सध्या दिल्ली, मुंबई किंवा बेंगळूर अशा मेट्रो शहरात पंचतारांकित हॉटेल्सचा खर्च प्रचंड सोसावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सीके खन्ना यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांना लेखी पत्र सुपूर्द करत त्यांच्या सूचनाही मागवल्या आहेत. त्यातील योग्य सूचना बैठकीत चर्चेतही आणल्या जाणार आहेत.