व्हीएस न्यूज – निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे नेते उच्चारवाने आमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल,असे सांगत असत आणि खरोखरच आघाडी सरकारपेक्षा हे सरकार वेगळे आहे. मंत्रालयाचे भाजप सरकारच्या काळात ‘आत्महत्यालय’बनले असल्याची घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. आपल्या शेतात आज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि आत्महत्येसाठी ते आता मंत्रालयाच्या दारातही येत आहेत. मंत्रालयाच्या दारात गेल्या तीन वर्षांत आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजप सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
बेरोजगार तरुणांनी, शेतकऱ्यांनी तसेच अन्यायग्रस्त लोकांनी गेल्या तीन वर्षांत मंत्रालयामध्ये न्याय मिळण्यासाठी उंबरठे झिजवले. पण आपल्याला मंत्रालयाच्या दारातही न्याय मिळणार नसल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयात धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर काँग्रेसच्या काळातील त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रकरण असल्याचे सांगण्याचा निर्लज्जपणा दाखविण्यात आला. भाजप गेले तीन वर्षे सत्तेत आहे मग धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्यायला भाजप सरकारमधील मंत्र्यांना कोणी रोखले होते, असा सवाल राज यांनी केला.
मंत्रालयाच्या दारात अधिवेशन सुरू असताना धर्मा पाटील यांच्या आत्महत्येपूर्वीही मार्च २०१६ मध्ये माधव कदम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. राजू आंगळे या तरुणाने त्याच वर्षी नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अलीकडेच एका तरुणाने मंत्रालयात सहाव्या मजल्याच्या सज्जावरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावर जागोजागी जाळ्या बसविण्याचा विचार सुरू झाला. जाळ्या बसविण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवले तर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002