व्हिएस न्यूज - गेल्या २५ वर्षांपासून द.आफ्रिकेचे दौरे करत असलेल्या आणि आत्तापर्यंत एकही सिरीज जिंकू न शकलेल्या टीम इंडियाने यंदा सहा सामन्याच्या एक दिवसीय मालिकेत ४-१ ने आघाडी घेत मालिका जिंकून नवा इतिहास रचला आहे. पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या पाचव्या वनडे मध्ये भारताने ७३ धावांनी सामना जिंकून ४-१ अशी आघाडी घेतली आहे. या विजयाचा शिल्पकार कप्तान विराट कोहली ठरलाच पण त्याला चायनामन कुलदीप आणि चहल या फिरकी गोलंदाजांनीही महत्वाची साथ दिली.
या विजयाने द.आफ्रिकेत मालिका जिंकणारा विराट पहिला कप्तान बनला तसेच वन डे मध्ये द.आफ्रिकेत ४०० पेक्षा अधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. डर्बन येथे झालेला सामना भारताने ६ विकेत्ने, सेंच्युरीयन येथील सामना ९ विकेटनी तर केपटाऊन येथील सामना १२४ रन्सनी जिंकून मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली होती. मात्र शनिवारी पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात द.आफ्रिकेने भारताला हरवून ३-१ अशी स्थिती केली होती. या मालिकेत कुलदीपने ५ सामन्यात १६ तर चहलने १४ विकेट घेतल्या आहेत. तर विराटने ५ सामन्यात ४२९ धावा फटकावताना दोन शतके व एक अर्धशतक ठोकले आहे.