व्हीएस न्यूज - दरमहा ५० कोटी रुपये, याप्रमाणे परतफेड करून पै न पै चुकती करण्याची ताजी ऑफर पंजाब नॅशनल बँकेच्या ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी दिली आहे. मोदी सरकारने तडजोड करणे शक्य व्हावे, यासाठी या घोटाळ्यावर कोणतेही थेट भाष्य न करता, दोन हात दूर राहून बँका आणि तपासी यंत्रणांना हे प्रकरण हाताळू देण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.
नीरव मोदीने दिलेल्या ‘ऑफर’चा मुद्दा सुनिल मेहता यांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेतही निघाला होता. पण मेहता यांनी तो विषय ती ऑफर मोघम असल्याचे सांगून तेवढ्यावरच सोडला होता. पण त्यानंतर निरव मोदीने पंजाब नॅशनल बँक,प्राप्तिकर विभाग व ईडी यांना पाठविलेल्या ताज्या ई-मेलमध्ये दरमहा ५० कोटी रुपये याप्रमाणे परतफेड करण्याची ऑफर दिली आहे. यावर निरव मोदीची ही ताजी ऑफर स्वीकारणे कितपत शक्य आहे, यावर पंजाब नॅशनल बँक व अन्य बँकांचे वरिष्ठ अधिकारी अहोरात्र खल करत आहेत. ते त्यासाठी मेहुल चोकसी यांच्या गितांजली ग्रुपला वेगळे काढून फक्त निरव मोदीशी संबंधित कंपन्यांची देणी निश्चित करण्यात व्यग्र आहेत.