नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे मोदी-जेटलींवर टीकास्त्र
मुंबई
2018-02-20
व्हीएस न्यूज - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा गंडा घालून परदेशी पलायन करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरेंनी देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, झोपा काढण्याचे काम आताचे रखवालदारही करत असल्यामुळे बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसे देशाबाहेर पळून जात असल्याची, टीका केली आहे. राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर मोदी-जेटली जोडीवर टीका करणारे व्यंगचित्र टाकलेले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात मोदी आणि जेटली यांना रखवालदाराच्या वेशात एका बँकेबाहेरील बाकड्यावर बसून झोपा काढताना दाखवले आहे. तर माल्ल्या, मोदी सारखी माणसे याचा फायदा घेत पळून जाताना पाहून सामान्य माणूस काय विचार करत असेल हे देखील राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून दाखवले आहे. राज यांच्या या व्यंगचित्राला सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळतो आहे.