व्हीएस न्यूज – मुंबई-पुण्यातील अघोरी शक्ती डी.एस.कुलकर्णींच्या बरबादीमागे असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून मराठी उद्योगपतीच्या मागे विजय माल्ल्या, नीरव मोदी यांच्याबाबत एक शब्दही न काढणाऱ्या अघोरी शक्ती हात धुऊन लागल्या आहेत. आतापर्यंत डीएसकेंनी सचोटीने काम केले. त्यांनी माल्ल्या-मोदींप्रमाणे पळ न काढता ते देशातच राहिले. एका प्रतिष्ठित व प्रेरणादायी उद्योगपतीची ही धूळधाण क्लेशदायक असल्याचे म्हणत मोदी यांचे राज्य देशात आल्यापासून व नोटाबंदीचे तांडव सुरू झाल्यापासून आर्थिक मंदीची लाट उसळली आणि डीएसकेच नव्हे तर अनेक उद्योजक त्यात देशोधडीला लागल्याचे सांगत मोदी सरकारवरही टीकास्त्र डागले.
नोटाबंदीच डीएसकेंच्या अधोगतीस कारणीभूत असल्याचे सेनेने म्हटले. सेनेने डीएसकेंच्या माध्यमातून मोदी सरकारवर ‘सामना’या आपल्या मुखपत्रातून निशाणा साधला. डीएसके हे बांधकाम व्यवसायात प्रतिष्ठेचे नाव होते. पण आर्थिक मंदीची लाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर उसळली. त्यांना त्यात प्रचंड नुकसान सहन करावे लागले. घराची विक्री मंदावली. ९ हजार १२४ कोटी रूपयांची डीएसके समूहाची एकूण मालमत्ता तर कर्ज १५०० कोटींचे आहे. पण त्यांची ही मालमत्ता विकली जाऊ नये व डीएसके पूर्ण बरबाद होऊन तुरूंगात जावेत यासाठी काही अघोरी शक्ती मुंबई-पुण्यात कार्यरत होत्या. हे अघोरी लोक फक्त मराठी लोकांच्या मागे लागले आहेत.
वर्षभरात सोळाशे किंवा सोळा हजार पटीने भाजप परिवारातील तरूण वर्गाची संपत्ती वाढते, त्यावर संशोधन नाही पण भ्रष्टाचारमुक्तीचा फणा डीएसके व इतरांच्या बाबतीत त्यांचा नागोबा काढतो, असे म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना नाव न घेता टोला लगावला.
००००००
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002