व्हीएस न्यूज - परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही दिलासादायक बदल केले असल्यामुळे ज्यांचा पासपोर्ट कागदपत्रांमुळे काढणे बाकी आहे, त्यांना दिलासा मिळू शकतो. आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
२६ जानेवारी १९८९ किंवा त्यानंतर ज्यांचा जन्म झाला, त्यांच्यासाठी जुन्या नियमांनुसार जन्माचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य होते. पण आता नव्या नियमांनुसार यामध्ये बदल करण्यात आला असून आता कोणतीही स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जन्म-मृत्यू रजिस्ट्रार किंवा संबंधित प्राधिकरणाने नोंद केलेली जन्म तारीख वैध धरण्यात येईल. याशिवाय मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेला शाळेचा दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल.
नव्या नियमांनुसार आई किंवा वडिलांचे नाव पासपोर्टच्या अर्जामध्ये देणे अनिवार्य नाही. आता कायदेशीर पालकाचे नाव अर्जदार देऊ शकतो. सिंगल पॅरेंट किंवा अनाथ व्यक्तींना या नियमामुळे दिलासा मिळेल. याशिवाय साधू किंवा संन्यासी त्यांच्या आध्यात्मिक गुरुचे नाव देऊ शकतात. अर्जातील कॉलमची संख्या घटवून ती १५ वरुन ९ करण्यात आली आहे. यामधील A, C, D, E, J आणि K कॉलम हटवण्यात आले आहेत. जुन्या नियमांनुसार, प्रत्येक कागद नोटरी, कार्यकारी मॅजिस्ट्रेट, प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्याकडून सांक्षांकित म्हणजे अॅटेस्टेड करुन आणावा लागायचा. आता अर्जदार एका साध्या कागदावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देऊ शकतो. त्यामुळे प्रत सांक्षांकित करण्यासाठी जी धावपळ करावी लागायची, किंवा अनेकदा यासाठी पैसेही द्यावे लागायचे तो सर्व मनस्ताप आता वाचणार आहे. विवाह प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. याशिवाय घटस्फोटित व्यक्तींना पती किंवा पत्नीचं नाव देण्याची गरज नाही.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002