व्हीएस न्यूज – नीरव मोदीच्या वकिलाने पंजाब नॅशनल बँकेने आर्थिक व्यवहाराला फसवणुकीचे नाव दिल्याचा आरोप केला असून सर्व बाबींची माहिती बँकेला होती. यासाठी बँकेने कोट्यवधीचे कमिशन देखील घेतले, पण ते आता मान्य करायला तयार नाही. बँकेचा हा आर्थिक व्यवहार होता ज्याला आता फसवणुकीचे नाव दिले जात असल्याचे मोदीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले.
अग्रवाल नीरव मोदीच्या पलायनाविषयी बोलताना म्हणाले, की ते आपली ५,००० कोटीची संपत्ती मागे सोडून का पळून जातील ? ते पळून गेलेले नसून हे प्रकरण बाहेर येण्यापूर्वीच उद्योगानिमित्त ते बिझनेस पासपोर्टवर विदेशात गेलेले होते व आता त्यांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या काही कुटुंबीयांकडे विदेशी नागरिकत्व असल्यामुळे तेदेखील बहुतांश वेळी बाहेर राहतात, असेही अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सध्या त्यांचा संपूर्ण उद्योग ठप्प झाला असून सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत. सीबीआयने अशा वेळी चार्जशीट दाखल केल्यानंतरच या प्रकरणी काय धोरण अंमलात आणायचे हे ठरवता येईल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.