व्हीएस न्यूज – रास्त धान्य योजनेच्या ज्या लाभार्थ्यांजवळ आधार कार्ड नाही, किंवा ज्यांनी त्यांचे रेशन कार्ड आधार क्रमांकाशी जोडलेले नाही अशा लाभार्थ्यांना या योजनेचे फायदे नाकारू नयेत, अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या असून, या सूचनांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
आधार कार्ड नसणाऱ्यांची नावे रास्त धान्य योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या यादीतून वगळू नये, असेही राज्य सरकारांना सांगण्यात आले आहे. रेशन कार्ड आधार कार्डला जोडलेले नसल्यामुळे रास्त धान्य दुकानातून धान्य नाकारण्यात आल्यामुळे झारखंडमधील ११ वर्षे वयाची एक मुलगी कथितरीत्या उपासमारीने मरण पावली होती. या घटनेनंतर या संदर्भातील सूचना गेल्या आठवडय़ात सर्व राज्य सरकारांना जारी करण्यात आल्या आहेत.
एखाद्या रेशन कार्डमधील लाभार्थ्यांची नोद चुकीची आहे ही बाब ‘संशयातितरीत्या’ सिद्ध झाली, तरच लाभार्थ्यांचे नाव रेशन कार्डच्या डेटाबेसमधून वगळले जाऊ शकते, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात स्पष्ट केले आहे. मात्र, आधार कार्ड नसल्याच्या कारणावरून लाभार्थ्यांना परत पाठवू नये आणि याबाबतचे सर्व अपवाद एका वेगळ्या पुस्तिकेत नोंदवावेत, असेही राज्यांतील अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. आधार कार्ड नसणे, ते जोडलेले नसणे किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरणात येणारी तांत्रिक अडचण यामुळे कुणालाही अन्नधान्य नाकारले जाऊ नये हे निश्चित करणे हा या सूचनांचा हेतू असल्याचे ‘आधार’ क्रमांक जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूएडीएआय)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002