व्हीएस न्यूज - महाराष्ट्रात शरद पवार बेरजेचे राजकारण करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ऐतिहासिक मुलाखतीमधील त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन आता त्यांची राजकीय बेरजांची आकडेमोड चुकत असल्याचे दिसत असल्यामुळे पवार त्यांच्या ऐतिहासिक मुलाखतीने इतिहासजमा तर होणार नाहीत ना ? याची आम्हाला काळजी वाटत आहे, अशी खोचक खंत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून व्यक्त केली आहे.
शरद पवार यांच्याकडून गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय भूमिका घेताना काही चुका होत असल्याचे दिसत आहे. यापूर्वीचा पवारांचा लौकिक लक्षात घेतला, तर ते आधी उत्तर काढायचे आणि त्यानुसार बाकीची राजकीय बेरीज-वजाबाकीची आकडेवारी भरायचे. त्यांचा यामध्ये हातखंडा होता. पण पवारांचे उत्तर गेली काही वर्षे चुकत आहे. त्यांच्या मुलाखतीतील ‘उत्तरे’ बरोबर असली, तरी त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल. तसेच देशातील स्वतः शरद पवार हे ज्येष्ठ नेते असले, तरी त्यांच्या राजकारणातील भूमिकांना कधीच स्थैर्य मिळाले नाही. जातीच्या राजकारणास पाठबळ देणाऱ्या भूमिका ते घेत राहिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, शरद पवार यांचा पूर्ण मान राखूनच आम्ही हे बोलत आहोत. ‘मंडल’ राजकारणाचा जोर सुरू असताना जातीय आधारावरच पवारांनी शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न कसा केला, हे काही फुले-आंबेडकर-शाहूंचा महाराष्ट्र विसरलेला नसल्याची आठवणही त्यांनी यातून करुन दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचा जोर सुरू झाला व मराठा समाजाचे लाखाचे मोर्चे निघू लागले, त्यांची तेव्हा मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका होती. अजित पवारांपासून सगळेच नेते या मोर्चात सामील झाले. पवार यांनी आधीच ‘मराठा’समाजास आरक्षण द्यावे ही एक भूमिका घेतली आहे. मग पुण्यातील ऐतिहासिक मुलाखतीत त्या भूमिकेस बगल मारुन आर्थिक निकषावरच आरक्षण मिळावे, या भूमिका मांडणाऱ्या पवारांना मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ का आली, असा प्रश्नही उपस्थित करत पवारांची आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे, ही भूमिका फक्त टाळ्या मिळवण्यासाठीच असेल, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
याशिवाय, शिवसेनेने पवारांवर सोयीस्करपणे बदलणाऱ्या राजकीय भूमिकांवरूनही निशाणा साधला आहे. पवारांना महाराष्ट्रात व देशात मान आहे व त्यांच्या राजकीय अनुभवाविषयी आदर आहे. आम्ही त्यांचे वय झाले आहे, असे सांगणार नाही. पण त्यांचा अनुभव वाढत आहे. आमच्या मनोहर जोशींप्रमाणे लवकरच त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा होईल, पण शरदचंद्र पवारांचे तेजस्वी विचार नेमके काय आहेत ते महाराष्ट्राला कधीच समजले नाहीत. ते २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजप सरकारला पाठिंबा देण्यासाठी सगळ्य़ात आधी पुढे आले व तेव्हा ‘जातीय’वादी भाजप त्यांना तेजःपुंज वाटला! आज भाजपचा पराभव हे त्यांचे ध्येय बनले आहे. या विचाराशी तरी ते ठाम राहोत, अशी खोचक टिप्पणी शिवसेनेने केली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002