नीरव मोदी प्रकरण हे युपीए सरकारचे पाप – देवेंद्र फडणवीस
मुंबई
2018-02-25
व्हीएस न्यूज - गेल्या २०१४ मध्ये सत्तेतून पाय उतार व्हावे लागलेले युपीए सरकारच हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणाला जबाबदार असून अशा काही महत्वपूर्ण कागदपत्रांवर त्याच सरकारने स्वाक्षऱ्या केल्यामुळे पंजाब नॅशनल बँक घोटाळा नीरव मोदी करू शकला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते एका वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
फडणवीस म्हणाले, की पीएनबी बँकेच्या कथित ११ हजार ४०० रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांना सर्व लाभ कसे मिळाले ? मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला तेव्हा आढळून आले, की मागच्या युपीए सरकारने सत्तेतून जाण्याच्या चार ते पाच दिवस आधीच, काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यामुळेच नीरव आणि मेहूल हजारो कोटींचा घोटाळा करू शकले. कुण्याही घोटाळेखोराला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वस्थ बसू देणार नाही. नीरव मोदीला ते पुन्हा भारतात आणून न्यायालयासमोर उभे करतील, असेही फडणवीस म्हणाले.