व्हीएस न्यूज – भारतीय संघाची श्रीलंकेत ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या तिरंगी टी-२० मालिकेसाठी घोषणा करण्यात आली असून विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, भुवनेश्वर कुमार, बुमराह, हार्दिक पंड्या या पाच महत्वाच्या खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. सलामवीर रोहित शर्माकडे कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर त्याचाच जोडीदार शिखर धवनकडे उपकर्णधारपद सोपवले आहे.
दिनेश कार्तिक व ऋषभ पंत असे दोन पर्याय यष्टीरक्षक म्हणून संघात ठेवण्यात आले आहेत. या टी-२० मालिकेतील तिसरा संघ बांगलादेशचा आहे. मालिकेतील सर्व सामने श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत. निदाहास ट्रॉफीसाठी संघ निवडताना खेळाडूंवरील ताण आणि भविष्यातील खेळाचे वेळापत्रक लक्षात घेतले आहे. वेगवान गोलंदाजाना दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यापेक्षा त्यांची कामगिरी चांगली होण्यासाठी त्यांना योग्य विश्रांती देणे गरजेचे आहे. असे निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद म्हणाले. विश्रांतीची विनंती धोनीने केल्यामुळे त्याची निवड करण्यात आली नसल्याची माहिती एम.एस.के प्रसाद यांनी दिली. संघात कर्नाटकचा फलंदाज लोकेश राहुलसह ऋषभ पंत, दीपक हुडा आणि विजय शंकर यांना स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर आणि बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची जबाबदारी जयदेव उनाडकट व शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांवर असेल. तसेच मोहम्मद सिराज, विजय शंकर हे मध्यमगती गोलंदाजीचे पर्याय संघात आहेत. फिरकीपटू यादवच्या गैरहजेरीत वॉशिंग्टन सुंदरवर मोठी जबाबदारी असेल. भारत, श्रीलंका आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या तिरंगी मालिकेतील पहिला सामना भारत-श्रीलंका संघात ६ मार्चला होईल. श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निदाहास ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002