व्हीएस न्यूज - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जनलोकपाल आंदोलनावर शिष्टाई अखेर निष्फळ ठरली असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चच्या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले आहे. महाजन केवळ मंत्री आहेत. दिल्लीतील बॉसच्या हातात सूत्र असल्यामुळे चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घ्या, असे अण्णा यांनी म्हटले आहे.
अण्णांनी आंदोलनाला रामलीला मैदानावर परवानगी मिळाल्याने चलो दिल्लीचा नारा दिला. अण्णांनी यावेळी लोकशाही देशाचा कारभार चार जण पाहत असल्याचा आरोप केला. तर हुकूमशाहीकडे देश कसा वाटचाल करत आहे, हे आंदोलनात सांगणार असल्याचे अण्णा म्हणाले.
कोणते विधेयक अधिवेशनात मांडणार ते अगोदर सांगा, असेही अण्णांनी बजावले. वेळ कमी पडत असल्यास अधिवेशनाचा कालावधी वाढवा, असेही अण्णांनी सुचवले. आता केवळ चर्चा नव्हे, तर ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. पत्रांना उत्तर देण्यासाठी परदेशी दौर्यातून पंतप्रधानांना सवड नसेल किंवा ईगो असेल, असा टोलाही अण्णांनी लगावला. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर रामलीला मैदानावर होणाऱ्या मोदी सरकारविरोधातील आंदोलनावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.