व्हीएस न्यूज - आणीबाणीच्या काळात देशात पुन्हा लोकशाही रुजावी यासाठी अनेकांनी संघर्ष केला. या संघर्षामुळेच केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पण पक्षवाढीसाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले ते आज सत्तेबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारख्या ‘त्यागी’ नेत्यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरु आहे, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
सोमवारी धुळे येथे मदनलाल मिश्रा यांच्या ‘आणीबाणी- चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्याला एकनाथ खडसे उपस्थित होते. भाषणादरम्यान खडसे यांनी भाजपला ‘घरचा आहेर’ दिला. आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी झाली. देशात पुन्हा लोकशाही रुजावी आणि नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी अनेकांनी आणीबाणीच्या काळात संघर्ष केला. हा संघर्ष केला नसता तर आज केंद्रात भाजपचा पंतप्रधान आणि १८ राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री नसते, अशी आठवण खडसेंनी करुन दिली. सध्याच्या तरुण पिढीला हा इतिहास माहित नसून सध्याच्या अनेक आमदार आणि खासदारांनाही याची माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. यासाठी आमदार- खासदारांचे विशेष वर्गही घ्यावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. आणीबाणीत संघर्ष करणारे सत्तेबाहेर आणि नारायण राणेंसारख्या त्यागी नेत्यांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे असेच सुरु राहिले तर जुन्या माणसांना न्याय कसा मिळणार असा प्रश्न त्यांनी विचारला.
आमदार अनिल गोटे हेदेखील या कार्यक्रमात उपस्थित होते. ते म्हणाले, आमचा पक्ष वाल्याचा वाल्मिकी करतो असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. पण सध्या वाल्यांच्या टोळ्या येत असून यामुळे वाल्मिकीचे वाल्या झाला नाही म्हणजे कमावले, असा टोला त्यांनी लगावला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002