व्हीएस न्यूज - गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवसर्जन यात्रेवर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीकास्त्र डागले. केंद्र व गुजरातमधील भाजप सरकार हे सर्वसामान्यांसाठी नसून देशातील फक्त ५ ते १० उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप केला. मोदी सरकार रोजगार निर्मितीत सपशेल अपयशी ठरले असून देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. मोदींच्या मेक इन इंडिया, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या बाता करणाऱ्या सरकारने किती स्वीस बँक खातेधारकांना तुरूंगात डांबले, असा सवाल उपस्थित करत गुजरातच्या लोकांमध्ये राग आहे तेच भाजपला ‘शॉक’ देतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
भरूच येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्याप्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. ते म्हणाले, भाजप सरकार काही ठराविक उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे. टाटा नॅनोसाठी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी ३३ हजार कोटी रूपये नाममात्र दरात दिले. यासाठी गुजरातमधील शेतकऱ्यांची जमीन, पाणी दिले. पण आज गुजरात काय देशातही नॅनो रस्त्यावरून धावताना दिसत नाही. या पैशांमध्ये गुजरातच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, असती. गरिबांकडून वीज, पाणी, जमीन घ्या, ती उद्योगपतींना द्या, हेच मोदींचे गुजरात मॉडेल असल्याचे ते म्हणाले.
आज समाजात राग आहे. प्रत्येकाला रोजगार हवा आहे. राज्यातील ९० टक्के शिक्षण क्षेत्रही उद्योगपतींच्या ताब्यात आहे. त्यामुळे गरिबांच्या मुलांना लाखो रूपये देऊन शिकता येत नाही. गुजरातमधील शिक्षण प्रचंड महागले आहे. तीच अवस्था आरोग्य क्षेत्रात असून धनाढय उद्योगपतींनी खासगी रूग्णालयांच्या माध्यमातून गरिबांची लूट चालवली असल्याचा आरोप त्यांनी केला. पैसे नसतील तर काम होणार नाही, हे गुजरात मॉडेल असल्याचे ते म्हणाले.
आपली मुख्य स्पर्धा ही चीनबरोबर आहे. त्यांची आणि आपली लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. चीनमध्ये दररोज ५० हजार युवकांना रोजगार दिला जातो. तर तेच मोदींच्या मेक इन इंडियामध्ये २४ तासांत अवघ्या ४५० युवकांना रोजगार मिळतो. संपूर्ण देशाला सांगितलं होतं की, मेक इन इंडिया अंतर्गत सर्व भारतातच होईल. पण तसं होताना दिसत नाही. गुजरातमध्येच ३० लाख लोक बेरोजगार आहेत, असेही त्यांनी म्हटले.
जीएसटी लागू करायला काँग्रेसचा विरोध नव्हता. पण ते लागू करताना हळूहळू लागू करावे व एकच कर ठेवावा, अशा सूचना आम्ही अरूण जेटलींना केल्या होत्या. पण त्यांनी आमचं ऐकलंच नाही. आज याचा सर्वाधिक फटका देशातील छोट्या छोट्या उद्योगांना,शेतकऱ्यांना बसत आहे. मोदींनी हसत हसत नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. याचा फटका शेतकरी, शेतमजूर, छोट्याछोट्या उद्योगांना बसला. हे सर्वजण रोखीत व्यवहार करतात. ते काळा धंदा किंवा चोरी करत नाहीत. काळा पैसा सोने आणि जमिनीत गुंतला आहे. सत्तेवर येण्यापूर्वी यांनी स्वीस बँक खातेधारकांना तुरूंगात टाकू असे म्हटले होते. किती जणांना मोदी सरकारने तुरूंगात टाकलंय. या निर्णयांमुळे देशाचा जीडीपी घसरला आहे. लोकांमध्ये आता राग आहे, त्यांना त्रास होतोय. याचा ‘करंट’ भाजप सरकारला निश्चित बसणार, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. जेटलींना विदेशातील मंडळी जे सांगतात ते योग्य वाटतं आणि देशातील गरीब जनता सांगते, त्याकडे ते दुर्लक्ष करतात, असेही ते म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002