व्हीएस न्यूज - रस्ते अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या भविष्यातील उत्पन्नाचा विचार करुन त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे यापुढे विम्याची रक्कम देताना मृत पावलेली व्यक्ती जिवंत असती, तर भविष्यात तिची कमाई किती असती, हे आता पाहिले जाणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. ‘सध्याची विम्याची रक्कम निश्चित करण्याची व्यवस्था योग्य नाही. वाहन कायद्यामध्ये न्यायसंगत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. मृत पावलेल्या व्यक्तीची सध्याची कमाई पाहून विमा निश्चित करणे, न्यायसंगत होऊ शकत नाही,’ असे मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले. या खंडपीठात न्यायमूर्ती ए. के. सीकरी, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा समावेश होता. या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार, यापुढे रस्ते अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम देताना त्याच्या सध्याच्या नव्हे, तर भविष्यातील उत्पन्नाचा विचार केला जाईल. यासोबतच संबंधित व्यक्ती नोकरी करत होती की तिचा व्यवसाय होता,हेदेखील लक्षात घेतले जाणार आहे.
रस्ते अपघातात मृत पावलेली व्यक्ती नोकरी करत असल्यास आणि तिचे वय ४० पेक्षा कमी असेल, तर त्या व्यक्तीचे उत्पन्न सध्याच्या कमाईपेक्षा ५० टक्के जास्त धरले जाईल. मृत पावलेली व्यक्ती ४० ते ५० वर्ष वयोगटातील असेल, तर भरपाईची रक्कम ३० टक्क्यांनी वाढवली जाईल. मरण पावलेली व्यक्ती ५० ते ६० वर्ष वयोगटातील असल्यास भविष्यातील उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढवले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002