व्हीएस न्यूज - भारतीय अर्थव्यवस्था वेगाने घोडदौड करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वर्ल्ड फूड इंडिया २०१७ च्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. वस्तू आणि सेवा करामुळे वेगवेगळे कर बाद झाले आहेत. त्यामुळे करव्यवस्था अतिशय सोपी आणि सुटसुटीत झाली आहे, असेदेखील मोदींनी म्हटले. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘खाद्य पदार्थांच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच कररचना सोपी झाल्याने त्याचा फायदा उद्योगांना होत आहे. त्यामुळे जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतो,’ असे मोदींनी म्हटले. ‘भारत एका मोठ्या क्रांतीसाठी तयार आहे. भारतात फूड चेन्सना चांगली संधी आहे. भारतात ग्राहकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे भारतात फूड चेन्स यशस्वी होऊ शकतात,’ असेही ते म्हणाले. सरकार मेक इन इंडियासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनी आज वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चे उद्घाटन केले. यामध्ये जगभरातील गुंतवणूकदारांसोबत प्रमुख कंपन्या सहभागी झाल्या आहेत. अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. खाद्य जगताशी संबंधित अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवणे, परकीय गुंतवणुकदारांना आकर्षित करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हादेखील हेतू या कार्यक्रमामागे आहे. पंतप्रधान मोदींनी अनेकदा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002