व्हीएस न्यूज - देशभरात लागू केलेल्या नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त केंद्र सरकारच्या या तुघलकी निर्णयाचा शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांच्या वतीने निषेध करण्यात आला. सकाळपासून अनेक संघटनांच्या वतीने बुधवारी (दि.8) पिंपरीतील आंबेडकर चौकात शोकसभा, निदर्शनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. यानिमित्ताने केंद्र सरकारच्या या निर्णयविरोधात संघटना एकवटल्याचे चित्र पहायला मिळाले.
कोणतीही पूर्वकल्पना न देता केंद्र सरकारने वर्षभरापुर्वी केलेल्या नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच अधिक बसला. काळा पैसाबाहेर काढण्यासाठी केलेला हा प्रयोग फसल्याचे लक्षात आल्याने सरकारने या नोटाबंदीची अन्य विविध घटनांशी तुलना करत नोटाबंदीचे लंगडे समर्थन करत असल्याचा विविध संघटनांच्या निदर्शनांमधून दिसून आला. याच मुद्द्यावर केंद्र सरकारवर टिका करण्यात आली.
“लुटारूंचा दिवस आंदोलन’…
नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले असून, या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. भाजप सरकारच्या या कृतीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बुधवारी (दि.8) “लुटारुंचा दिवस आंदोलन’ करण्यात आले. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. काळा पैसा बाहेर काढण्याचे अमिष दाखवून भाजप सरकारने वर्षभरापुर्वी नोटाबंदी केली. बॅंकेतून रक्कम काढण्यावर निर्बंध लादण्यात आले. मात्र, यामुळे सर्वसामन्य नागरिकांचे मोठे हाल झाले. एटीएमच्या रांगेत उभ्या राहिलेल्या अनेक निष्पाप नागरिकांना विनाकारण जीव गमवावा लागला. या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले असून, हे हळुहळू आता समोर येऊ लागले आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीतून भाजप सरकराने सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली आहे, अशा शब्दांत देवेंद्र तायडे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली. नोटाबंदी करण्याचे पंतप्रधानांना अधिकार आहेत की देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या रिजर्व्ह बॅंकेला? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित करत, देशात लोकशाहीच्या बुरख्यातुन एकाधिकारशाही सुरु असल्याची टिका त्यांनी केली. तसेच याविरोधात सर्वसामान्य जनता याचा बदला घेईल, असे ते म्हणाले. या आंदोलनात भारत कुंभारे, सुधीर कांबळे, सुधाकर साबळे, संजय खरात, मिलिंद केदारी, सुभाष गवळी, राजु वनकर, मनिषा साळवे आदीसह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
डाव्या संघटनांचे आंदोलन…
केंद्र सरकारच्या नोटाबंदीला विरोध करत, डाव्या विचार सरणीच्या विविध संघटनांनी एकत्र येत, पिंपरीत आंदोलन करत निषेध केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना हक्काची रक्कम काढण्यासाठी बॅंकेत तासनतास थांबावे लागले. यामध्ये शेकडो निरपराध नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी केला. तर काळा पैसा बाहेर काढण्याचे कारण सांगत, केलेल्या नोटाबंदीचा निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असून, केंद्र सरकारने या निर्णयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची संघटीतपणे लूट केल्याचा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला. या आंदोलनात स्वराज अभियान, डी.वाय.एफ.आय., शेतकरी कामगार पक्ष, लोकजागर संघटना, टी.यू.सी.सी., प्रहार जनशक्ती पक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि पंचशील मंडळ या संस्थाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सामान्य नागरीक बलिदान दिवस…
समाजवादी पक्षाच्या वतीने नोटाबंदीच्या निषेधार्थ सामान्य नागरिकाचा बलिदान दिवस पाळण्यात आला. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चौकात मौन पाळत केंद्र सरकारच्या निषेध केला. या आंदोलनात रफिकभाई कुरेशी,सालारभाई शेख, रवि यादव, प्रा. नरेंद्र पवार, बाबा नदाफ, जावेद शाह, विनोद भालेराव, सायराबानू शेख, शहनाज शेख आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाची श्रद्धांजली…
केंद्र सरकारने सर्वसामन्यांवर लादलेल्या नोटाबंदीच्या काळात रोख रक्कम काढण्यासाठी सर्वसामान्यांना तासनतास रांगेत ताटकळत थांबावे लागले. याकाळात देशभरात शेकडो नागरिकांचा नाहक मृत्यू झाला. या सर्व निरपराध नागरिकांना कॉंग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या वतीने बुधवारी (दि.8) भोसरीत आयोजित केलेल्या श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉंग्रेस कमिटीच्या सदस्या निगार बारसकर यांनी या शोकसभेत मनोगत व्यक्त केले. या नोटाबंदीमुळे शेकडो निरपराध नागरिकांचा बळी गेला. हक्काची रक्कम काढण्यावर निर्बंध घातल्यामुळे चलन टंचाई निर्माण झाली. त्यामुळे अनेक मुलींची लग्ने मोडली. कामगार, उद्योग, सराफ बाजार, सर्वसामन्य विक्रेता व नागरिकांना याचा मोठा फटका बसला. केंद्र सरकारला या दु:खाची कल्पना नाही. मात्र, याकाळात नाहक बळी गेलेल्या नागरिकांच्या कुटंबियांच्या दु:खात कॉंग्रेस पक्ष सहभागी आहे, अशा शब्दांत त्यांनी या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, नहासचिव अशोक मंगल, पार्यवरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे, उपाध्यक्ष सतीश पैठणकर, सदस्य मंगल मोहिते, एस.टी. कांबळे, रोहन वाघमारे, दिलीप पांढारकर, निसार बारसकर, शांताराम मोरे, पोपटभाऊ पवार, राजू साळुंखे, केरबा शिंदे, बाळासाहेब काळे, संदीप मोरे, विकास चव्हाण, राज वैद्य, सांगदेव गालफाडे, अंबादास म्हेत्रे, साहेबराव निंबर्गीकर, रमेश सरोदे आदी उपस्थित होते.
रिपाइंकडून “व्हाईट मनी डे’ साजरा…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) व्हाईट मनी डे साजरा करण्यात आला. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नोटबंदीचे पक्षाच्या वतीने समर्थन करण्यात आले. या कार्यक्रमास बाळासाहेब भागवत, बाळासाहेब ओव्हाळ, सम्राट गायकवाड, अशोक गायकवाड, भरत खरात, विलास गरड, विष्णु गजधने, नितीन गायकवाड, बापू गायकवाड, रत्नमाला सावंत, राघु बनसोडे आदी या वेळी उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002