व्हीएस न्यूज - भारतात रामाशिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ‘प्रभू राम आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहेत. संपूर्ण देशाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू प्रभू रामच आहेत,’ असेही आदित्यनाथ यांनी म्हटले. यासोबतच अयोध्येतील वाद मिटवण्याचा प्रयत्न करणारे आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांचेही त्यांनी कौतुक केले. अयोध्येतील वाद संपुष्टात आणण्यासाठी संवाद साधणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक व्हायला हवे, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी आदित्यनाथ यांनी अयोध्येतून प्रचाराला सुरुवात केली. अयोध्येतून प्रचाराची सुरुवात करण्यात आल्याने अनेकांकडून मंदिर-मशिदीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावर आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी भाष्य केले होते. यासोबतच आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनीही अयोध्येचा दौरा केला आहे. तर श्री श्री रवीशंकर १६ नोव्हेंबरला अयोध्येत येणार आहेत.
उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज संस्थांसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. महिलांसाठी शौचालयांची उभारणी करु, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. महिलांसाठी नि:शुल्क पिंक टॉयलेट सुरु करु, असे भाजपने जाहीरनाम्यात म्हटले आहे. तरुणांची मने आणि मते वळवण्यासाठी फ्री इंटरनेट आणि अन्य सुविधा देऊ, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002