व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेची भीती वाटत असून गांधी कुटुंबीयांची बदनामी करण्यासाठीच केंद्र सरकार जुनी प्रकरणे उकरुन बाहेर काढत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मोदी सरकार सूडाचे राजकारण करत असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.
शरद पवार सध्या चंद्रपूरच्या दौऱ्यावर असून विविध घटकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या बदलत्या प्रतिमेची नरेंद्र मोदींना भीती वाटते. यामुळे जुनी प्रकरणे उकरुन बाहेर काढली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. राजीव गांधींची बोफोर्स प्रकरणात निर्दोष सुटका झाली, तरीदेखील सरकारने पुन्हा हे प्रकरण उघडण्याचा प्रयत्न केला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गांधी कुटुंबीयांची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे. राजीव गांधी हे आधुनिक युगातील दुरदृष्टी असलेले नेते होते. जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी देखील गरिबी हटवण्यासाठी काम केले, असे सांगत शरद पवारांनी गांधी कुटुंबावर स्तुतीसुमने उधळली. अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव येथे बुधवारी आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला होता. याचा दाखला देत पवार म्हणाले, भाववाढीसाठी शेतकरी अस्वस्थ होणे साहजिक आहे, पण अशावेळी त्यांच्या बळाचा वापर टाळला पाहिजे होता. सरकारच्या ‘मी लाभार्थी’ जाहिरातीत ३४ हजार कोटींची कर्जमाफी ७० लाख शेतकर्यांना देण्यात आली, शेतमालाला भाव दिल्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न ४० हजार कोटींनी वाढले, असे छापले आहे. राज्यकर्त्यांनी इतके मोठे असत्य वक्तव्य करू नये, यामुळे शेतकरी नैराश्यात जाऊ शकतो, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002