व्हीएस न्यूज - माध्यमांमुळे नवनवीन घटना कळतात. देश व राज्यातील पत्रकारितेला समृध्द असा वारसा व इतिहास आहे. पत्रकारितेचा समाजावर फार मोठा प्रभाव राहिला असून तो यापुढेही कायम राहील. तसेच माध्यमांनी समाजाला पुढे नेण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले. जिल्हा माहिती कार्यालय, धुळे आणि शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वृत्तपत्र व जनसंज्ञापन विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात माध्यमांपुढील आव्हाने या विषयावरील खुल्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार बळवंत बोरसे, योगेंद्र जुनागडे, दिलीप विभांडीक, हेमंत मदाने, आशुतोष जोशी, विलास पवार, वृत्तपत्र व जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख अनिल चव्हाण, वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे पुढे म्हणाले, विविध प्रकारची माध्यमे आली. प्रत्येक माध्यमाची स्वतंत्र अशी शैली राहिली आहे. पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या आगमनानंतरही माध्यमांचे महत्त्व अबाधित आहे. सोशल मीडियाच्या आगमनानंतरही माध्यमे आपले महत्व कायम राखतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर माध्यमांचे स्वरुप बदलले. आता मार्केटींगला प्राधान्य मिळाल्याचे चित्र आहे. माध्यमांना व्यवसायाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रभाव वाढला असून या माध्यमावर जे पाहिले जाते तेच दाखविले जाते. मात्र, या माध्यमांमध्ये काम करताना विश्वासार्हता महत्वाची आहे. त्यासाठी कमी वेळेत सर्व स्त्रोतांची पडताळणी करुनच वृत्त द्यावे. या माध्यमात रोजगाराची संधी अधिक आहे. मात्र, त्यासाठी बहुश्रूत आणि मल्टिटास्किंग काम करण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. तसेच वाचक हाच खरा परीक्षक आहे. राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरीय दैनिकांच्या व्यापात साप्ताहिकांनी आपली समाजाला गरज आहे, हे दाखवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:चा मार्ग शोधला पाहिजे. साप्ताहिकांमध्ये बदल घडून येत आहेत. त्यामुळे २१ व्या शतकातही साप्ताहिके कायम राहतील, असे मतही यावेळी वक्त्यांनी मांडले. तसेच जिल्हास्तरावरील दैनिकांपुढे आव्हाने याविषयावर बोलताना सांगितले, कुशल मनुष्यबळाची अनुपलब्धता हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीने किमान आपल्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्राची माहिती करुन घेणे आवश्यक आहे. मुद्रित माध्यम हे विश्वासार्ह माध्यम असून यात वाचक संख्या वाढण्याची मोठी संधी आहे. तसेच राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान व मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारितेला चांगली संधी उपलब्ध झाली आहे. वृत्तपत्रे चालवितांना आर्थिक पातळीवर विचार करताना सामाजिक बांधिलकी महत्वाची आहे. दिशादर्शक विचार मांडले, तर लोकांचाही पाठिंबा मिळतो, असेही यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
भारतीय राज्यघटनेचा सरनामा वाचून उद्घाटन.
'माध्यमांसमोरील आव्हाने' याविषयावर आयोजित परिसंवादाचे उद्घाटन भारतीय राज्यघटनेचा सरनामा वाचून करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी सरनाम्याचे वाचन केले. यावेळी पत्रकार, वृत्तपत्र व जनसंज्ञापन विभागाचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002