व्हीएस न्यूज - साडेसहा हजार रुपये पेन्शन, महागाई भत्ता मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे ईपीएस ९५ पेन्शनधारकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे. दि.१६ नोव्हेंबर १९९५ रोजी महामंडळाने ईपीएस योजना लागू केली. हा दिवस निवृत्तांसाठी काळा दिवस ठरला आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
शहरातील संतोषीमाता चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. तेथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चातील शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानुसार, अनेक अडचणी, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात आम्ही सेवा बजावतो. निवृत्तीनंतर तुटपुंज्या रकमेमुळे जीवन जगणे कठीण होते. कर्मचाऱ्यांना किमान दरमहा साडेसहा हजार रुपये निवृत्ती वेतन व महागाई भत्ता मिळायला पाहिजे, तात्पुरता दिलासा म्हणून आता तातडीने दरमहा तीन हजार रुपये निवृत्तीवेतन आणि त्यावर महागाई भत्ता सुरू करावा, निवृत्तीसंदर्भात ११ मे २०१७ चे परिपत्रक रद्द करावे, कमी केलेले निवृत्ती वेतन, अन्न सुरक्षा योजनेत निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, ज्येष्ठांना महामंडळाची बस आणि रेल्वेत पन्नास टक्के सवलत द्यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. या मोर्चात संघटनेचे अध्यक्ष विनायक पाटील, एम. जी. धिवरे, जगदीश देवपूरकर, देविसिंग जाधव, एस. टी. पाटील, एम. आर. ठाकूर, एल. आर. राव, किशोर कुलकर्णी, सुभाष काकुस्ते, येरडावकर, एम. आर. वाघ, डी. वाय. पवार आदींसह पेन्शनर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002