व्हीएस न्यूज - राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता अद्यापही दिसत नसल्याने आणि त्यातच जळगाव जिल्ह्य़ाच्या राजकारणात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना देण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पाश्र्वभूमीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे नाराजी व्यक्त करीत आले आहेत. चोपडा येथे आयोजित कार्यक्रमात विकासात आपला अडसर वाटल्यानेच आपणास दूर ठेवण्यात आल्याची अस्वस्थता त्यांनी व्यक्त केली.
चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी खडसे यांनी जळगाव जिल्ह्य़ाचा विकास काही कालखंडात स्थिरावला असल्याची नाराजी व्यक्त केली. तापी नदीवरील पाडळसरे धरणाला पैसा देण्याची भूमिका आपली होती, परंतु विकासात आपला अडसर वाटल्याने आपल्याला दूर ठेवले जात आहे, असा तडाखा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता हाणला. आपण मंत्रिमंडळात असताना राज्यातील सूत गिरण्यांना प्रति चाते तीन हजार रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता, परंतु त्यावर दीड वर्षांत कोणतीच सकारात्मक हालचाल झाली नाही. सूतगिरण्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे. मदत मिळाली, तरच सामान्य माणसास न्याय देणारे प्रकल्प सशक्तपणे चालतील. तरच त्यांना ‘अच्छे दिन’ येतील. जिल्ह्य़ातील सहकारी प्रकल्प सुरू राहावेत, त्यामुळे सुबत्ता यावी म्हणून जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपण सहकार्याची भूमिका घेतली आहे. चोपडा सूतगिरणीच्या कर्ज प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचे खडसे यांनी नमूद केले.
संपूर्ण जिल्ह्य़ात सूत गिरण्या बंद पडल्याचे चित्र असताना चोपडा सूतगिरणीचे अध्यक्ष कैलास पाटील यांच्या नेतृत्वात कौतुकास्पद कार्य होत असल्याचे खडसे यांनी सांगितले. कैलास पाटील यांनीही प्रकल्पाचा आढावा सादर करून खडसे सरकारमध्ये नसल्याने जिल्ह्य़ाचा विकास खुंटल्याचे सांगितले. खडसे मंत्रिमंडळात जावेत म्हणून कार्यकर्त्यांनी दबावतंत्र वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे आदी उपस्थित होते. खडसे यांचे स्वागत माजी आमदार कैलास पाटील, शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख इंदिराताई पाटील आदींनी केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002