धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे व्यक्त केली खंत
व्हीएस न्यूज - व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांनी, सामांन्यांची बाजू घेऊन त्यांचे प्रश्न वेशिवर टांगण्याचा प्रयत्न करणाऱ्याच, संघटनांच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडणाऱ्या राज्यातील काही पत्रकारांवर सरकारचे पोलीस खाते पाळत ठेऊन असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून पत्रकारांवर पाळत ठेवण्याच्या प्रकाराबद्दल चिंता आणि संताप व्यक्त केला आहे.
मराठी पत्रकार परिषद पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. मात्र, अशा कोणत्याही दडपशाहीला मिडिया भीक घालणार नाही, असेही त्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
धनजंय मुंडे यांनी दोन पानी सविस्तर पत्रात जय महाराष्ट्रचे पत्रकार मंगेश चिवटे आणि फ्री प्रेस जर्नलचे पत्रकार विवेक भावसार यांची उदाहरणे दिली आहेत.मंगेश चिवटे करमाळा-टेंभुर्णी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आवाज उठवित होते. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने यासंदर्भात काही आंदोलने देखील केली होती. त्यांना यासंदर्भातली जाब विचारणारा दुरध्वनी 24 तारखेला आला. सदरचा दुरध्वनी 0217-2317044 या क्रमांकावरून आल्याचे मंगेश चिवटे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर नमुद केलेले आहे. तसेच, एशियन एज विवेक भावसार यांनाही सतिश मांगले आणि मनिषा मोपलवार यांच्या संदर्भात छापलेल्या एका बातमीबाबत जाब विचारणारा धुरध्वनी ठाणे क्राईम ब्रांच मधून आल्याचे भावसार याचं म्हणणं आहे. भावसार यांचे फोन टॅप होत असावेत असाही त्यांना संशय आहे. दोन्ही प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राज्यातील इतरही विशेषतः सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांची पाळत असल्याचे समोर येत आहे. पत्रकारांच्या समाजमाध्यमांवरील पोस्ट, त्यांच्या वृतांकनाच्या कृती, त्यांचा समाजातील वावर, त्यांच्या हालचाली, त्यांचे कार्यक्रम, त्यांची आंदोलन आदी गोष्टी देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. जे पत्रकार राज्यातील भोंगळ कारभाराची लक्तरे वेशिवर टांगत आहेत, अशा पत्रकारांवर विविध प्रकरणात अडकवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. नागपूर जिल्ह्यातील एका पत्रकारावर वृत्तसंकलानासाठी गेला असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पत्रकारांमध्ये मोठी अस्वस्थतः आहे. जे पत्रकार राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतात. अशा पत्रकारांच्या मालकावर दबाव आणून त्यांना नोकरीचे राजीनामे द्यायला भाग पाडले जात आहे. अलिकडंच एका मोठया मराठी वाहिनीच्या संपादकाला अशाच पध्दतीनं जावं लागलं आहे. या घटना पत्रकारांच्या अभिव्यक्ती आणि लेखन स्वातंत्र्याच्या संकोच करणाऱ्या असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करता येईल, असे वातावरण तयार करावे असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002