मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
व्हीएस न्यूज – राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर आजच साडेसहा हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने मुंबईत पहिले जिल्हा भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
वारणा विविध उद्योग समूह आणि शिक्षण संकुलातर्फे वारणानगर येथील इंजिनीअरिंग कॉलेजच्या मैदानावर रात्री वारणा परिवाराशी मुक्त संवाद ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ प्रश्नोत्तर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या वेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. सुमारे सव्वा तास संवाद चालला. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. या निमित्ताने वारणा परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज परत करत असतो. त्यामुळेच ग्रामीण भागातील सोसायटय़ा टिकून आहेत. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना आम्ही प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपये देतो. या रकमेत निश्चितपणे वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुळात कर्जमाफी ही योजना नाही तर अडचणीत सापडलेल्या शेतक-याला ती मदत आहे.
गेल्या वेळच्या कर्जमाफीत अनेक नेत्यांनी आपले हात धुऊन घेतले. तसा प्रकार होऊ नये आणि लोकांचा पैसा वाया जाऊ नये म्हणून अतिशय पारदर्शीपणे ही योजना राबविण्यासाठी आम्ही काही निकष लावले. त्यातून १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर आजच साडेसहा हजार कोटी रुपये जमा केले आहेत, असेही ते म्हणाले.
शिक्षकांच्या बदल्या मेमध्येच करण्यात येतील. विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल, तेथे एसटी बस उपलब्ध करून दिल्या जातील. माथाडी कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही फडणवीस सांगितले.
कर्जमाफी योजनेतील महाराजांचे नाव बदलण्याची मागणी
शेतकरी कर्जमाफी योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदलावे आणि त्यांचा अपमान थांबवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांंनी कऱ्हाडच्या विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवापासून कोल्हापूर दौ-यावर आहेत. दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकरी कृती समितीने काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तत्पूर्वीच पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002